मनुस्मृतीचे दहन
शूद्रावर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खाली दिलेले आहेत. स्मृतिकाराने अस्पृश्यांवरकेलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख करावा लागेल.
समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदली असावे.शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याची उपस्थितीत करू नये.इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्याजीवास एका कवडीची पण किंमत नाही. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.शुद्राने कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर ते शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये.वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्यांची मुक्ती आहे.उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिया करावी.शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.
मनुस्मृतीची होळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो प्रचंड तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. कुप्रसिद्ध मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[१५] मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणार्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून सर्व प्रकारची विषमता व शोषण नष्ट करण्यासाठी समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेचा पुरस्कर्ता असलेल्या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले .[१६] या मनुस्मृतीने हिंदू समाजाचे दीड-दोन हजार वर्षे नियमन केलेले होते. आणि त्यामुळे ती, परिषदेच्या ठरावातील भाषेनुसार, शूद्रजातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबल नष्ट करून सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी होती. मनुस्मृतीचे दहन ही घटना म्हणजे इतिहासातील एक महान मूर्तिभंजक कृती होती होती आणि हजाराहून अधिक वर्षाच्या कालावधीत बसला नसेल असा सनातनी हिंदू धर्माला बसलेला तो जबरदस्त धक्का होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दूरगामी होते की, त्या घटनेची तुलना त्यांच्या काही अनुयायांनी ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चनधर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केले.
१९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावर जोर देऊन म्हटले होते, ‘‘ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वत: समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!’’ तेव्हापासून दरवर्षी ‘२५ डिसेंबर’ हा दिवस मनुस्मृती दहन दिन[१७] म्हणून आंबेडकरी समाज हा देशभरच नव्हे तर जगभर साजरा करतो.
Comments
Post a Comment